सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

आठवड्याचा मधला वार. सकाळी कामाला जाताना कारमध्ये रेडिओवर आकाशवाणी एफएम गोल्ड चालू होते. मनातली मराठी गाणी. एक फरमाईश आली. अमर भूपाळी चित्रपटातील “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या गाण्यासाठी. निवेदक मंगेश वाघमारे नेहमीप्रमाणे चित्रपट व गाण्याबद्दल अधिक माहिती देत होते. रासक्रीडेमध्ये रंगलेल्या गोपींना सोडून गुप्त झालेल्या कृष्णाला त्या गोपी भानावर आल्यावर शोधीत आहेत व आर्तपणे आळवीत आहेत त्याचे अप्रतिम वर्णन होनाजी बाळा यांनी केले आहे.

रासक्रीडा करिता वनमाळी, हो | सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी | कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे | वियोग आम्हांलागी तुझा ना साहे………

मन एकदम चाळीस वर्षे भूतकाळात गेले. सत्तराचे दशक व शाळेतील दिवस आठवले. हे गाणे व आमचे भागवत सर यांचे अतूट नाते आमच्या मनात जुळले होते.

भागवत सर आम्हाला मराठी शिकवीत. शाळेच्या वेळात कडक, पण शाळा सुटली की संध्याकाळी मुलांच्यातलेच होऊन जात. उत्तम वाचन. तल्लख विनोदबुद्धी. व गोड गाणारा गळा. स्वतः पेटी वाजवून गात असत. सरांचे घर व कुटुंब पनवेल जवळ पळस्पे गावात होते. आमची शाळा मुंबईत गिरगावात. त्यामुळे सर आठवडाभर शाळेतच रहात व आठवड्याच्या शेवटी घरी जात. शाळा सुटली की अभ्यासापेक्षा नाटक, गाणे, वाचन जास्त आवडणारी आम्ही उनाड मुले व भागवत सर यांची टीचर्स रूममध्ये मैफिल जमत असे. कधी पुस्तकांवर चर्चा, कधी नाटकाची तयारी, पण बहुतेकवेळी पेटीवर बसून गाणे व गाण्यावर चर्चा. शास्त्रीय संगीत शिकणारे इतर मित्र व सर अगदी रंगात येत असत. त्या मित्रांची तयारीही चांगलीच असे. उदाहरणच घ्यायचे तर आजचा आघाडीचा संगीतकार अनंत अमेम्बल माझ्या एक वर्ग पुढे होता. त्याचा घरातच गाणे. आणखी एक होता त्याचे वडील गाण्याचे क्लास चालवत असत व हा स्वतः मॅन्डोलीन वाजवीत असे. तबला व पेटी येणारे बरेच होते. म्हणजे तयारी काय असेल याची कल्पना करा. आम्ही नुसते कानसेन. या मैफिलीचा शेवट बहुतेक वेळा “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला” या फ़र्माइशीमध्ये होत असे. सर हे गाणे अतिशय सुरेख व तल्लीन होऊन गात असत.

शाळा संपली. पुढे उपनगरात रहायला गेल्यावर गिरगाव सुद्धा सुटले. पुढची काही वर्षे हे गाणे रेडिओवर ऐकू आले की सरांची व शाळेची आठवण एवढेच राहिले. पुढे व्यवसायानिमित्त देशाबाहेर गेल्यानंतर हे गाणे रेडीओवर ऐकू येणेही थांबले.

शाळा सुटल्यानंतर तीस वर्षानी परत येऊन पुण्यात स्थायिक झालो. शाळासोबत्यांचा शोध सुरु झाला. त्यातील एक मित्र ठाकूर. पनवेल जवळ स्थायिक झाला होता. त्याचे सरांकडे अजून जाणेयेणे होते. एकदिवस त्याने सरांच्या घरूनच फोन लावला व म्हणाला, “अरे, हा आवाज ओळखतो का बघ” व फोन सरांना दिला. आवाज ऐकून मी अवाक. तीस वर्षानी मी माझ्या आवडत्या सरांचा आवाज ऐकत होतो. त्या उमलत्या वयातील मृदू आठवणी उफाळून वर आल्या व व्यवहाराने निबर झालेल्या मनाला एका क्षणात चिंब भिजवून गेल्या. डोळ्यामधून पाणी येणे तेवढे बाकी होते.

कुठे होतास, काय करतोस, बायको मुले काय करतात असे चौकशी झाल्यावर सर म्हणाले, “आता  मनसोक्त गप्पा मारायला मी पुण्याला तुझ्याकडे दोन दिवस रहायला येतो ठाकूरसोबत म्हणजे मस्त मैफिल जमवता येईल. पेटी आहे कि नाही तुझ्याकडे, का घेऊन येऊ? मी आणि ठाकूर दिवस ठरवतो व कळवतो.”

“सर आमची ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ची फर्माईश अजून आहेच बर का”. फोन ठेवता ठेवता ठाकूर म्हणाला.

“अरे, ती कशी विसरेन” असे म्हणत सरांनी चक्क फोनवरच मुखडा गाऊन दाखवला. “बाकीचे प्रत्यक्ष  भेटीत येत्या एक दोन आठवड्यात.” असे म्हणत फोन ठेवला.

तीन चार दिवसानी ठाकूरचा फोन आला.

“कोणता दिवस ठरवलास सरांबरोबर?” माझा पहिला प्रश्न. ठाकूर काहीच बोलला नाही.

“हॅलो हॅलो…”.

थोडेसे खाकरून ठाकूर पुन्हा गप्प झाला. मग अडखळत बोलू लागला.

“कसे सांगू तुला…… सर आता येऊ शकत नाहीत……. अरे आपले सर गेले….. आजच अपघात झाला. पनवेलला त्यांच्या दुचाकीला ट्रकने पाठून उडवले…… सर ट्रकखाली आले.”

“नको, नको. तू बिलकुल येऊ नकोस. तुला पाहवणार नाही व पाहूही नकोस. सरांचा डावा डोळा, भुवई व कपाळाचा थोडा भाग सोडता बाकी काहीही चेहरा ओळखता येत नाहीए….. तू नको येउस.”

मी सुन्न.

सर गेले, पण गोपींच्या मनातील ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ ही आर्तता मात्र आमच्या हृदयात कायमची ठेऊन गेले.

DSC_1613

(वरील प्रसंग दुर्दैवाने प्रत्यक्षात घडलेला आहे)

फुरसत के रात दिन

वर्षभर रगडून काम केल्यावर मिळालेली व्हेकेशन. भरपूर प्लॅन करून आखलेले रीलॅक्स्ड टूर शेड्युल, तरीही फोटो काढण्याचा नादामुळे कमी पडणारा वेळ. त्यामुळे एका मुक्कामावरून दुसरा गाठताना होणारी घाई. अशाच एका प्रवासात मध्यप्रदेशातील बांधवगडाकडे जाताना तसा उशीर झाला होता तरीही चहा घेण्यासाठी वाटेवरील एका टपरीवर थांबलो होतो. संध्याकाळचे चार-सव्वाचारच वाजले होते. जानेवारीचा महिना. हवेत छान गारवा होता. उतरत्या उन्हाची ऊब हवीहवीशी वाटत होती. आजुबाजुला सगळीकडे शेती व अधेमधे शेतकर्‍यांची घरे होती. लोक शेतावरून घराकडे परतू लागले होते. आम्ही सोडल्यास इतर कोणालाही कसलीही घाई नव्हती. सारे काही शांतपणे चालू होते.

त्या टपरी समोरील घराचे हे चित्र. घर तसे भरलेले व “वेल-टू-डू” शेतकरी कुटुंबाचे वाटत होते. दारापुढे गाई-म्हशी बांधल्या होत्या. अंगणात एक बाई लहान मुलाला “एक पाय नाचिव रे गोविंदा” म्हणत चाल चाल करत होती. दुसरी वयस्क बाई तिच्याशी गप्पा मारत बसली होती. बहुतेक सासू-सुना असाव्यात. शेतावरून येणारी बाप्येमंडळी एक एक करीत त्या आई-मुलाजवळ जमा झाली व बाळाचे कौतुक पाहू लागली. मग थोडयावेळाने काठी टेकत-टेकत आपली पांढरी स्वच्छ दाढी सांभाळत एक आजॊबा सावकाश चालत आले व त्या बाळाच्या कौतुकात सामिल झाले. काही वेळाने आजोबा त्या वयस्क बाईशी काहीतरी बोलले. तशी ती लगबगीने उठली व घरात गेली. आजोबांनी बहुतेक चहा मागितला असावा. पण एकंदरीत कारभार फारच निवांतपणे चालला होता. रोजच्या धावपळीच्या जीवनातून जे “फुरसतके रात दिन” अनुभवायला आम्ही येवढे लांब आलो होतो ते साक्षात समोर होते. बस्स, असे वाटले की तो संथपणा अंगाखांद्यावर झेलत व अंगप्रत्यंगात घोळवत येथेच बसून रहावे. पण….पण आमच्या, स्वत:च आखलेल्या, “रीलॅक्स्ड” टूर शेड्युलमध्ये ते बसत नव्हते. पटापट चहा पिऊन १०० कि.मी. वरील पुढच्या मुक्कामास काळोख पडायच्या आत पोहोचण्यास आम्ही मजबूर होतो.

रोजची धावपळ जिंकण्याच्या, प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट प्लॅनिंग करण्याच्या व सतत काहीतरी अचिव्ह करण्याच्या सोसातून बाहेर पडून फुरसतीचे आयुष्य जगणे आपल्याला कघी कळेल का हो? आणी समजा कळलेच तरी ते वळेल का हो? काही कळतच नाही.

रुसवा

आमच्या गच्चीमध्ये कबुतरे खूप येतात. त्यांचे गुटर्गू व प्रणयाराधनेचे खेळ तर बाराही महिने चालू असतात. त्यामधल्या एका क्षणाचा हा फोटो.

काय म्हणतोय तो नर त्या मादीला?

मला तर रफीने गायलेले वंदना विटणकर यांचे गाणेच आठवते आहे –

हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा, सोड ना अबोला

झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा

बनलो निशाना, सोड ना अबोला

मला फोटो देऊन दोन्ही कबुतरे उडून गेली. तिने रुसवा सोडला कि नाही, माहीत नाही. नसेल तर तो दुसरी मादी शोधेल व ती देखिल दुसरा नर. त्या रुसव्याला, नकाराला तेथेच सोडून जेव्हां मूड लागेल तेव्हां तो क्षण असलेल्या साथिदारासोबत मनमुराद उपभोगणारे आझाद पंछी ते, एका नकारासाठी आयुष्य वार्‍यावर उधळणार्‍या वेडया मनुष्य जमातीला नक्कीच हसत असतील.

एक तो “रामबोला”च वेगळा निघाला. माहेरी गेलेल्या बायकोला – रत्नावलीला – भेटण्यास आतुर झालेला रामबोला दोन प्रहर रात्री खिडकीला लटकणार्‍या सापाला धरून रत्नावलीच्या खोलीत शिरला. त्याचा वेडेपणा पाहुन बायकोने धिक्कारल्यावर सरळ श्रीरामाचीच साथसंगत धरली. रामबोला संत तुलसीदास झाले. आयुष्य त्यानेही उधळले पण श्रीरामांवर, आणी पक्ष्यांसारखे अलगद संसारातील जन्म-मरणाच्या फेर्‍यापलिकडे उडून गेले.

एक झाड आणी…….

पुण्याजवळील भिगवण हे पक्षीप्रेमी लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द गाव. तेथे काढलेला हा फोटो. तो पहाता पहाता “एक झाड आणी दोन पक्षी” असे शीर्षक एकदम डोळ्यांपुढे आले. 

संस्कृतमधील एका श्लोकामध्ये देह, मन व आत्मा यांचे वर्णन “एक झाड आणी दोन पक्षी” असे केले आहे. एक झाड म्हणजे आपण स्वत: आणि दोन पक्षी म्हणजे आपले मन व आत्मा. त्या श्लोकामध्ये पुढे असे वर्णन आहे की आयुष्याच्या झाडावरती असलेले हे दोन पक्षी. एक (म्हणजे मन) सर्व फळे खातो पण तरीही दु:खी व असमाधानी आहे.  दुसरा (म्हणजे आत्मा) काहीही खात नाही आणी सतत शांतपणे पहिल्याचे निरिक्षण करतो. 

जर वरील फोटोला हे शीर्षक दिले तर मग या खालच्या फोटोला काय शीर्षक द्यावे? येथे तर दोन्हीही पक्षी एकमेकांकडे पाठ फिरवून बसले आहेत. 

मला वाटते पहिल्या फोटोला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगापूर्व्रीचे)” व दुसर्‍याला “एक झाड आणी दोन पक्षी (कलियुगातील)” म्हणावे. कलियुगातील मन फार हुशार झाले आहे. आपल्या सर्व वासनांना त्याने येवढे सोज्वळ रूप दिले आहे कि जणू प्रतिआत्माच. आणी तो आत्मा बिचारा शोधतोय की तीन युगे निरिक्षण केलेले ते काळेकुट्ट, सतत फडफडणारे मन गेले तरी कुठे?

 

चलो, फिरसे अजनबी बन जाये

“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो”…….

गीतकार साहिर. गायक महेन्द्र कपूर. चित्रपट गुमराह. 

मला आठवते तेंव्हापासून गाण्याची ही पहिली ओळ मला तुफान आवडते. या ओळीचे शुद्ध भाषांतर म्हणजे “चला पुन्हा एकदा एकमेकांना अनोळखी होऊया”.  चित्रपटात “आपण एकमेकांना विसरून जाऊया” याच अर्थाने ही ओळ वापरली गेली असावी. पण माझ्या मनात भरलेले भावांतर मात्र वेगळेच आहे. ते आहे “चला पुन्हा एकदा एकमेकांची जुनी ओळख विसरून नवी ओळख करून घेऊया”.  उर्दू शब्दांना अनेक छटा असतात. अजनबी या शब्दाची एक छटा म्हणजे नविन, नवपरिचीत, पूर्वपरिचितच्या विरुद्धार्थी. 

परिचित, ओळखीचे म्हणजे तरी काय? आपले पूर्वानुभव, पूर्वग्रह व आठवणी. त्यावर आधारीत पुढे काय होईल किंवा समोरचा माणूस पुढे कसा वागेल याबद्दलचे आपले अंदाज. बहुतांशी समोरच्याचे वागणे आपण आपल्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच पहात असतो. नवपरिचित व्यक्ती जेंव्हा परिचित होत असते तेंव्हा हे काही नसते. आपण फक्त कुतुहलाने निरिक्षण करीत असतो. समोरील व्यक्तिमत्वाचे पैलू फक्त जाणून घेत असतो. आपल्या अंदाजांचा चष्मा अजून तयार झाला नसतो. पण थोडी जान-पहचान वाढली कि वाटते समोरचा माणूस मला समजला. असे वाटू लागले कि आपला चष्मा झालाच तयार. मग संबंध जितके जास्त वाढतात तितका चष्म्याचा रंग अधिक गडद होत जातो. 

अरे, आपण स्वतःलाच अजून ओळखलेले नसते तर समोरच्याला कसे ओळखणार? मग आपण हा चष्मा तयारच केला नाही तर? तर आपल्या प्रतिक्रिया तरी पूर्वग्रहदूषित नसतील. समोरील व्यक्तिमत्वाचे अधिकाधिक पैलू आपल्या नजरेस जसेच्या तसे पडतील. पूर्वी बोचलेल्या कंगोर्‍यांना परिस्थितीच्या दगडावर घासून नियती त्यांचे पैलूंमध्ये रुपांतर करते आहे हे जाणवू लागेल व त्यांचा गहिरा रंग आता मनाला अधिकच भुरळ पाडेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, येणारा प्रत्येक क्षण आपल्याला जसा आहे तसा अनुभवता येईल. हो कि नाही? आणि म्हणूनच

“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये …….” .

 

मला पहिली ओळ जेवढी आवडते तेव्हढाच आवडतो त्या नज़्मचा शेवट –

वो अफसाना जिसे अंजामतक लाना न हो मुमकिन

उसे एक खूबसुरत मोड देके छोडना अच्छा

आकांक्षा असणे, जीवनात अपेक्षा ठेवणे हे मनुष्यस्वभावाला स्वाभाविक आहे. पण त्या पूर्ण होणे हे सर्वस्वी त्याच्या हातात नसते. ती नियती असते ना, ती स्वतःचेच खरे करत असते. माणसाच्या हातात शुद्ध हेतुसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे येवढेच असते. “मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला” याचा आनंद मात्र फक्त त्याचाच असतो. तो काही नियती हिरावून घेऊ शकत नाही. मग जे मनोदय पूर्ण होत नाहीत त्याबद्दल कटु आठवणी बाळगण्याचे कारण काय? आणी जे होतात ते तरी लक्षात कशाला ठेवायचे? आपल्या हक्काचा आनंद मिळाला कि त्या सुंदर वळणावर आत्तापर्यन्त केलेल्या कष्टांना व बाळगलेल्या त्या आशा-आकांक्षांनाही म्हणावे, 

“चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये …….” .

 

 

मुरलीधर श्याम

वो काला एक बांसुरीवाला। सुध बिसरा गया मोरी रे॥   सुध बिसरा गया मोरी……. ॥

माखनचोर वो नंदकिशोर। कर गयो ओ s रे, कर गयो मनकी चोरी रे ।

सुध बिसरा गया मोरी……. ॥

अनुप जलोटा यांनी गायलेले हे प्रसिद्ध भजन. हे ऐकताना तो कृष्ण कसा दिसत असेल असे विचार नेहमी मनात येत असत. मग अनेक चित्रकारांनी रंगवलेला कृष्ण डोळ्यांपुढे येई. पण तो कृष्ण नीळा असे. अनेक मंदिरामधील कृष्णाच्या मुर्ती तर संगमरवरी असतात. मग काळा कृष्ण कसा दिसत असेल ते काही मनापुढे स्पष्टपणे येत नसे.

गेल्या आठवडयात कर्नाटकातील प्रसिद्ध बेल्लुर मंदिरात जाण्याचा योग आला. बेल्लुर येथील प्रमुख मंदिर चन्नकेशवाचे आहे. त्या बाजुलाच एक महाविष्णुचे मंदिर आहे. आत शिरल्यावर मुख्य सभागृहाच्या डाव्या उजव्या अंगाला अनेक छोटया देवदेवतांच्या खोल्या किंवा गाभारे आहेत. त्यातील एका खोलीत हा कृष्ण लपला होता. तो दिसला आणि माझ्या मनाने एकदम तान छेडली – वो काला एक बांसुरीवाला – आणि मग माझी अवस्था काही क्षण – सुध बिसरा गया मोरी रे – अशीच झाली.

ठेंगणी ठुसकी कृष्ण दगडातील कृष्ण-मुर्ती एका काळ्या गोल दगडावर उभी होती. अगदी आपला पंढरपूरचा पांडुरंग जसा विटेवर उभा आहे तशीच. तो विठोबा देखिल कर्नाटकातून नाव बदलून महाराष्ट्रात आलेला कृष्णच आहे म्हणे – ‘कानडाउ विठ्ठलु करनाटकु तेणे मज लावियेला वेधु’.  पुंडलिकासाठी विटेवर वाट बघत उभा राहिलेला विठोबा तो. नाव-गाव बदलले तरी सवयी नाही बदलल्या. तसाच विटेवर उभा, भक्तांची वाट बघत. बहुतेक त्या मोठयाचेच हे लहानपणचे रूप असावे. जरीकाठाचे रेशमी धोतर नेसवलेला. डावा पाय सरळ व उजवा थोडा वाकवलेला. ओठावरील बासरीचा नाद अंगांगात भरवून जणू डोलत असलेला. कपाळभर गंध  व या सर्वांच्या पलिकडचे त्याचे जादुभरे कमल-नयन. ते तुमच्यावर कधी गारुड करुन जातात काही कळतच नाही. आज आठवडा उलटला तरी ते गारुड काही अजून उतरले नाहीये व उतरावे अशी इच्छाही नाही.

माझ्या मनाची आक्रंदने मात्र म्हणताहेत……

 छुप गयो फिर एक तान सुना के, कहां गयो एक बाण चला के ॥

गोकुल ढुन्ढा मैने मथुरा ढुंढी, कोइ नगरीया ना छोडी रे….

…..सुध बिसरा गया मोरी॥

सकाळी रंगलेला मारुबिहाग

मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. आमचे एक नातेवाईक एका प्रतिथयश शाळेचे मुख्याध्यापक होते. वाचन उत्तम. विविध कलांबद्दल त्यांना चांगली महिती होती. जनसंपर्कही तेवढाच चांगला. भाषेवर उत्तम प्रभुत्व. अतिशय गोष्टीवेल्हाळ माणूस. त्यामुळे आम्ही मुले त्यांचा शब्द म्हणजे अगदी ब्रम्हवाक्य समजत असू. मोठया माणसांच्या गप्पांमध्येदेखिल ते काय बोलत आहेत हे कान देऊन ऐकत असू. 

एकदा मोठया माणसांमध्ये हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताविषयी चर्चा चालू होती – कोणता राग कधी आळवावा याची. मुख्याध्यापक त्यांच्या सतार शिकणार्‍या होतकरू शेजार्‍याची गोष्ट सांगू लागले. यांच्या घरी एक मोठ्ठे गायक आले असतांना त्या शेजार्‍याने त्यांना बळेच सतार ऐकवण्याचा आग्रह धरला. सकाळचे आठ वाजले होते व तो मारुबिहागचे सूर छेडू लागला. त्या गायकांनी त्यास तेथेच थांबवले व अतिशय तुटकपणे म्हणाले, “रवीशंकर हा राग फक्त सायंकाळनंतर वाजवतात, तेंव्हा आपण हा राग ज्यावेळी सायंकाळनंतर वाजवण्यास शिकाल त्यावेळी मी ऐकण्यास येईन.” 

मला तेंव्हा त्या गायकांचा खूप राग आला. त्या शिकणार्‍याला जर सकाळचा रागच अजून शिकवला नसेल तर त्याने काय वाजवून दाखवावे? पण तात्पर्य पक्के डोक्यात बसले – प्रत्येक रागाच्या ठराविक वेळा असतात व ते राग तेंव्हाच गायचे वाजवायचे असतात. मारुबिहाग हा तर संध्याकाळनंतरच गायचा असतो नाहीतर गोहत्येपेक्षा मोठे पातक लागते असाही एक समज त्या लहान वयात झाला होता. (पण मग मध्यरात्रीचे राग हे गुरू मध्यरात्रीतच शिकवतात का, हा प्रश्न मात्र आजतागायत अनुत्तरीतच राहीला होता.) 

पुण्याच्या आमच्या इमारतीत सर्वच हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतात जाणकार आहेत. यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. नसते तरच आश्चर्य. वर्षानुवर्षे सवाई ऐकून कोणाचे कान तयार होणार नाहीत? पण आमच्या समोरच्या सदनिकेत एक काका रहातात. ते उत्तम गातात. नोकरी करीत असतांना अतिशय कष्ट घेऊन रियाज चालू ठेवला. हल्लीच सेवानिबृत्त झाले आहेत व आता पूर्णवेळ गाण्यास देत आहेत. त्यांचा आवाज कमावलेला व बुलंद आहे. रियाज़ करतांना मोकळ्या गळ्याने (म्हणजे full throated बरं का) गातात. व वारा वाहता राहण्यासाठी सदनिकेचे दार उघडेच ठेवतात. सोसायटीत सर्वांना ऐकू येतो त्यांचा रियाज व त्यांना प्रतिक्रियाही लगेच मिळतात. आमचा प्रत्येक दिवस त्यामुळे तोडी, भटीयार, ललत इ. च्या तालावर सुरु होतो व यमन, कल्याण, बागेश्री, भैरवीचे आलाप घेत रात्र सुरेल करीत लयास जातो. 

आज शनिवार. काल रात्री TV वर late night action movie पाहुन झोपी गेलो होतो. आज डोळे उघडता उघडता कानी काकांचे सूर पडले – “रसिया आओ ना sssss”. अरे ! हा तर मारुबिहाग. काका तब्बेतीत गात होते. आवाज छान लागला होता. म्हणजे रात्रच आहे. झोप लागली आहे असा भासच झाला वाटते. मग हा येव्हढा उजेड कसला? आडवे होतांना Tube light बंद करण्यास विसरलो असे वाटून ताडकन उठलो. पहातो तो खरच शनिवार उजाडला होता. आणी…..आणी काका मारुबिहागच गात होते. मला लगेच मुख्याध्यापकांचा वरचा प्रसंग आठवला. ते गायक आज येथे रहात असते तर काकांचे भविष्य काही खरे नव्हते असा विचार करून मनाशीच हासू आले. पण तरीही मारुबिहागची सकाळी सकाळी मझा घेत दात घासणे, चहा पिणे झाले. पेपर वाचता वाचता काकांचे मारुबिहाग आळवणे मध्येच कधी थांबले हे कळलेच नाही.

बाकी आटपता आटपता आठ वाजले आणी लाईट गेले. आता निदान अर्ध्या तासाची निश्चिंती म्हणून गाडी पुसण्यास बादली व फडके घेऊन खाली उतरलो. गाडीवर पाणी मारून होते न होते तेवढयात पाठीमागून काका लुंगी सावरत सावरत पिशवी घेऊन खाली उतरतांना दिसले. बहुतेक काकींनी वाण्याकडॆ धाडले असावे. अगदी राहवले नाही तेंव्हा म्हणालो, “काका राग मस्त जमला होता, मूड मस्त केलात – रसिया आओ ना – क्या बात है.” काका खूष झाले. मग अगदीच राहवले नाही तेंव्हा मनातील मळमळ मोकळी केली. “काका मारुबिहागच गात होतात ना? सकाळी कसा?” 

गेटपर्यंत पोहोचलेले काका एकदम थांबले व गर्रकन मागे फिरले. त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रसन्न भाव होता. मला हुश्श वाटले. काकांना राग नव्हता आला. 

ते म्हणाले, “अरे तुला मारुबिहागची गम्मत सांगतो. अमुक अमुक घराण्यात तो असा गातात”……काकांनी गाऊन दाखविले. “पण माझे गुरू तो असा गात असत”……पुन्हा काकांचे गाणे सुरु. 

काय दृष्य होते ते. अर्ध्या चड्डीतला मी ओल्या फडक्याने गाडी पुसतोय. काका लुंगीत बाजुला उभे व रंगात येउन गात आहेत. तो देखिल मारुबिहाग. “रसिया आओ ना”. सकाळी सकाळी. हातात वाणसामानाची पिशवी घेऊन. 

पुढे ते म्हणाले, “काल रात्री काही केल्या माझे सूर गुरूंच्या शिकवणीप्रमाणे येत नव्हते. सूर डोळ्यांसमोर नाचत होते पण गळा काही साथ देत नव्हता. शेवटी अतिशय नाराज होऊन झोपलो. पण पहाटे डोळे उघडण्याआधी गळा हवे ते सूर छेडीत होता. मग वेळेचा काय संबंध? अरे, हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?” 

काका आता त्या रागातील खाचाखोचा समजाऊन सांगत होते, मनापासून गात होते. गाडया पुसणारे आमची इतर रसिक शेजारीही आता भोवती गोळा झाले व मारुबिहागची मजा घेऊ लागले. दिवसाची कुठली वेळ आहे याचे भान आम्हा कोणालाही उरले नव्हते. 

“अहॊ, आधी पोहे आणी वाणसामान घेउन या. मग मैफ़ल जमवा घरातच. बोलवा सगळ्यांना. कांदेपोहे करते सर्वांसाठी”. काकींनी वरच्या मजल्यावरून हाळी दिली आणी काकांना आपण कशासाठी खाली उतरलो आहोत याचे भान आले. काकांनी मग आवरते घेतले आणी आम्हीही आपापली कामे पूर्ण करण्यास पांगलो, मारुबिहागाचे सूर मनात घोळवत, सकाळची वेळ असुनही. 

एक सत्य आज अचानक समोर ठाकले होते. हे सुरांचे राज्य आहे. ते राजी असतील तेव्हांच काय ते खरे. सूर जुळले की वेळेचे काय चालते त्यांच्यापुढे?

पणत्यांची आरास

दिवाळीच्या दिवसात घरात न रहाण्याचा रिवाज या वर्षी पाळता आला नाही. प्रथम व्यवसायानिमित्त देशाबाहेर रहाणे झाले. मग परत आल्यावर तीन-चार कुटुंबातील लहान-मोठया सर्वांना सुट्टी मिळून एकत्र भारतदर्शन करण्यास हे दिवस बरे असतात असे जाणवल्यामुळे दिवाळीची सुट्टी घराबाहेर असेच समीकरण झाले होते. या वर्षी Swine-Flue देवतेच्या कृपेने मुलांच्या सुट्या कधीच संपल्या व आम्ही पुण्यातच होतो. मुंबईहून पुण्यात नुकतेच स्थलांतरीत झालो असल्यामुळे आम्हाला हे शहर नविनच होते. ’तेथे’ हरवलेली मराठी संस्कृती येथे ठायीठायी भेटत होती. मग कोणीतरी सांगितले की दिवाळीच्या दिवसात पहाटॆ पुण्यात सारसबागेत पणत्यांची आरास करतात. लगेच आमच्या फोटो काढण्यास आसुसलेल्या स्वार्‍या सज्ज झाल्या.

पहाटे साडेपाचला निघण्याचा हुकुम गृहमंत्र्यांनी जारी केला होता त्यावेळेबरहुकुम प्रस्थान केले. जसजशी सारसबाग जवळ येऊ लागली तसतसे रस्त्यालगतचे पार्किंग फुल्ल दिसू लागले. जरा आश्चर्यच वाटू लागले. पुण्यात येवढया लौकर हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे पहिला मोकळा slot मिळल्यावर गाडी पार्क करून पायउतार झालो. थोडे पुढे गेल्यावर महालक्ष्मीच्या मंदिराचा कळस दिसला. देवीचे दर्शन घेऊन पुढे जावे असा विचार करित होतो. पण दाराबाहेरील भलीमोठी रांग पाहून पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. विचार रद्द केला. बाहेरूनच हात जोडले व सारसबागेकडे मोर्चा वळवला.

सारसबागेच्या दारापासून गर्दी तर होतीच. अगदी “सवाई गंधर्व”ला रमणबागेत असते तशी. रेटारेटी नाही पण जरा थोडे जास्त इकडॆतिकडे हलले तर कोणाला तरी धक्का लागेल येवढी. जवळूनच स्पिकर्स टेस्ट केल्याचा आवाजही येत होता. तरुणाईच्या जोडीने बुजुर्गही तेवढेच होते. सर्वचजण सणाचे ठेवणीचे कपडे घालून सजले होते. कदाचित म्हणूनच बुजुर्गही तरुणच दिसत होते. ती तरुणाई अंगावर झेलत झेलत तळ्यातील गणपतीच्या कमानीतून आत शिरलो. मंदिराभोवताली खरच पणत्यांची व रांगोळ्यांची आरास मांडली होती. माझा कॅमेरा आता “सुटला” होता.

आत गाभार्‍यात श्रींचे अभ्यंगस्नान चालू होते. अतिशय देखणी उजव्या सोंडेची मूर्ती आहे. “कृपया मूर्तीचे फोटो काढू नये” असे बोर्ड दिसल्यामुळे कॅमेरा म्यान केला व श्रींना मनसोक्त मनात साठवून घेतले. मग पुन्हा रांगोळ्यांचे फोटो काढण्यास बाहेर पडलो.

भोवताली लावलेल्या पणत्या वा‍र्‍यामुळे विझत होत्या. एक पणती विझली कि ती पुन्हा चेतवण्यास दहा हात पुढे सरसावत होते व सर्व दिवे तेवते ठेवत होते. ते पाहून मन आत कुठेतरी हलत होते, डोलत होते व आतली पणती चेतवत होते.

आता देवळातून बाहेर पडून सारस बागेतील तळ्यात फुललेली कमळे टिपत टिपत पुढे सरत होतो.

अचानक बासरीचे सूर व जोडीने सतारीची दिडदा दिडदा ऐकू येऊ लागली.

Amit Kakade (Flute) & Prasad Gondkar (Sitar)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रायोजित कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली होती. बरेच लोक उपस्थित होते. मनापासून दाद देत होते.

Babasaheb Purandare & Mangesh Tendulkar

सकाळच्या रागांनंतर “घनःश्याम सुंदरा”चे स्वर बासरी व सतारीवर आळवले जाऊ लागले. पाखरे आपापली घरटी सोडून आकाशात झेपावली होती.

पूर्वॆला उषेचा रक्तिमा पसरला होता व मन्दिराच्या दारात आता भाविकांची दाटी झाली होती.

आमची पाऊले दिवाळीच्या फराळावर आडवा हात मारायला परत फिरली, मनात कुठेतरी हरवलीशी वाटणारी लहानपणीची दिवाळी पुन्हा एकदा भेटल्याचे समाधान घेऊन.

फुले वेचण्याचा दिवस

माझी पहिली मराठी चित्तरकथा…….

मोठ्ठा वीकएण्ड. सोमवारी दसरा. तीन दिवस सुट्टी. “काका, शेतावर येणार का उद्या? आम्ही सगळे जातो आहोत. झेंडू फुललाय.” शुक्रवारी संध्याकाळी मेघ्याने ललकारले.

मेघराज, मेघ्याच खरतर, आमच्या पलीकडच्या सोसायटीत राहतो. त्याची व आमची सदनिका अगदी समोरासमोर. अगदी खोलीसमोर खोली आणि खिडकी समोर खिडकी. ती सुध्हा फ़्रेन्च विंडो, भलीमोठ्ठी. फोन सोडा, वॉचमनची सुध्हा जरूरी नाही आमच्या घरांना. आमच्या समोरासमोर गप्पा सुरु झाल्या की दोन्ही सोसयट्यातील टीवी एकतर बंद तरी होतात नाहीतर जोरात वाजू लागतात. असो.

मेघ्या कंप्युटरच्या क्षेत्रामधील. पण त्याने शेती करायचे मनावर घेतले आणि आणखी दोन मित्रांना बरोबर घेऊन एक शेतच खरेदी केले. आठवडाभर शेतावर कामगार असतात पण दर वीकएण्डला स्वतः जाऊन राबतो. या वेळी झेंडू लावला होता. शंभर एक किलो पीक आले होते. दोन दिवसात फुले खुडणे आवश्यक होते. मेघ्या तोडणी कामगार गोळा करत होता. तीन्ही मित्रांचे आई-वडिल खुशीने तयार होते. मी केवळ फोटो काढणार या अटीवर जाण्याचे मान्य केले.


शेत पुण्याजवळ पारगाव-खन्डाळा येथे आहे. एका तासाचा ड्राईव्ह एन एच ४ वरून. तीन गाडया भरून तोडणी कामगार सकाळी पुण्याच्या ६ वा निघाले. घडयाळाचा काटा चुकून ६.३०/ ६.४५ अशी काहीतरी वेळ दाखवत होता. मुंबईचे घडयाळ ते, अजून पुण्याला सरावले नव्हते. वीकएण्डला ब्रेकफास्ट म्हणजे हिन्दुस्तानचे पॅटीस, इडली किंवा तत्सम जे काही वाण्याकडे तयार मिळेल ते. पण पुण्याच्या वाण्याचे ६:०० मुंबईच्या घडयाळातील ८:०० वाजता उजाडतात. थोडक्यात, तोडणी कामगारांची रिकामी पोटे कात्रजचा बोगदा ओलांडल्यावर गाडीपेक्षा जास्त आवाज करू लागली होती.

मग मेघ्याने पहिला हाल्ट खोपडेमामांच्या टपरीवर लावला. स्टोव्हचा आवाज, चहाची उकळ, मिसळीच्या कटाचा झणझणित वास, भजीचा काढलेला पहिला घाणा, बटाटवडा तळण्याच्या पूर्ण तयारीत असलेल्या मामी, अशा अतिशय उत्साहवर्धक दृष्य-गंधाच्या दुनियेची चाहुल लागताच गाडीतील सर्व कामगार एकदम फ्रेश दिसू लागले व पटापट खाली उतरले. “या या” मामांनी अतिशय प्रेमाने स्वागत केले. मेघ्या त्यांचा नेहमिचा पावणा होता व आता तर भोवानीलाच उगवला होता. “तरीच मी म्हणत होते की हा सकाळी मला न उठवता चहादेखिल न घेता कसा जातो शेतावर” मेघ्याची आई पुटपुटली. बाकीच्या आयांनी त्याला सहमतीदर्शक माना डोलावल्या. सगळ्या बाबांच्या मुखावर एक छद्मी स्मितरेषा उमटून गेली. पण मिसळ, भजी, वडा व मग गोडुस चहा असा नाश्ता सर्वांनीच हाणला. मिसळ तर एकदम तुफान होती. गरम गरम जळजळीत कटामुळे चव फारशी कळली नाही तरीही किक मात्र जबरदस्त बसली. शेत आता फक्त ५ कि.मि. वर होते.

हायवे सोडून गावाच्या रस्त्याला लागलो. थोड्याच अंतरावर डांबरी रस्ता संपून मातीचा रस्ता सुरू झाला. दूरवर सुर्यफुलांची छोटीशी लागवड केलेली दिसली. मग मातीही गेली व दगड दिसू लागले. गाडया अनोळखी आवाज करू लागल्या. तेवढयात समोर एक घर दिसले. मेघ्या म्हणाला “हे आपले पार्किंग. त्या बैलगाडी जवळ पार्क करा. आता यापुढे दोन किलोमिटर वर आपले शेत”.

तोडणी कामगार पायवाटेने भराभरा शेताकडॆ चालू लागले. मी आपला कॅमेरा गळ्यात अडकवून हळूहळू इकडॆतिकडॆ बघत पुढे सरकू लागलो. बाजूला गवताच्या गंजी लावल्या होत्या. जवळच एक गाय व तिचे वासरू अगदी निवांत चरत होते. हवेत एक धुन्द करणारा मोकळेपणा होता.

पायवाटेच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार गवत, (कारळ्याची?) पिवळी फुले, कसलीतरी रानटी कणसे व सुन्दर तुरे दिसत होते.

असे आणखी थोडे पुढे गेल्यावर झेंडूची लागवड दिसू लागली. लोक भराभरा फुले वेचू लागले होते.

मी आपला फोटो काढत होतो. मग मला कोणीतरी नर झेंडू व मादी झेंडू असा फरक समजावून दिला. खरे खोटे कोण जाणे. दोन प्रकार मात्र वेगळे दिसत होते.

नर झेंडू Male Marigold
नर झेंडू Male Marigold
मादी झेंडू Female Marigold
मादी झेंडू Female Marigold
शेताच्या मधोमध एक झाड होते त्यावर मला बयेची घरटी दिसली. पाखरे मात्र नव्हती.
आता ऊन्हे वर आली होती. फोटो करपवत होती. बाजुलाच एक पक्के घर बांधले होते. मी माझा मोर्चा तिकडे वळवला. घरात ५-६ छान शॉट मिळाले. ट्रायपॉड नाही याचे इतक्या वर्षात पहिल्यांदा दुःख झाले. लो-लाईट मधे फोटो काढतांना त्रास झाला. सपोर्ट घेतला तरी थोडा शेक आलाच फोटोत. असो.
The ubuquitous power meter
Grinding Stone with carving on it
Bedroom cum Store room
Dressing Table
Kitchen Shelf
फुलांच्या जोडीने मिर्ची टोमॅटो देखिल खुडुन झाले. फुलेही काढून झाली होती. १०० एक किलो जमली. आतापावेतो १:०० वाजला होता. हा पोटाचा १:०० होता त्यामुळे येथे घडयाळाचा काही संबंध नव्हता. आम्ही बरोबर नेलेले उपमा वगैरे खाऊ लागलो, तेवढयात गावातून चुलीवर भाजलेली भाकरी, लाल रस्सा असलेली उसळ असे खास जेवण आले. सर्व घामेजलेले भुकेले कामगार त्यावर तुटून पडले.

शेतापासून १५ मिनिटांच्या अंतरावर एक तळे आहे. तेथे दुपारी ऊन झाले की गारव्यासाठी ससे, हरणे, कोल्हे, रानडुकरे इत्यादी प्राणी येतात तेथे फोटो सेशन साठी जाण्याचा प्लॅन होता. पण आता तुडुंब भरलेल्या पोटाने व जडावलेल्या देहाने असहकार पुकारला. तेंव्हा पुन्हा परत येण्याचा वादा करून आम्ही झेंडूंनी भरलेल्या गाडया पुण्याकडे वळविल्या.